हापूस आंबा आणि कोकणचे एक वेगळे नाते आहे. कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, हापूस आंब्याला आवश्यक आहे अशा स्वरूपाची आदर्श नैसर्गिक व्यवस्था यातून जगातील सर्व फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो. हे कोकणचे मुख्य पीक आहे आणि ही कोकणातील शेतकऱ्यांची मुख्य अर्थव्यवस्था आहे. मागील २५ वर्षांत हापूस आंब्याच्या शेतीचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलले. लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. आज कोकणात जवळपास तीन लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने येथील शेतकरी प्रचंड परिश्रम करून, हापूस आंब्याची शेती करतात. आत्ता कोकणात दर वर्षी तीन लाख टन म्हणजेच दोन कोटी हापूस आंब्याच्या पेट्याइतके हापूसचे उत्पादन निघते. ही जवळपास तीन हजार कोटी रुपयांची अर्थव्यवस्था आहे आणि संपूर्ण कोकणची मुख्य अर्थव्यवस्था व रोजगारनिर्मितीचे प्रमुख साधन आहे. दुर्दैवाने हापूस आंब्याची शेती अधिकाधिक मोठी होत गेली; पण ही विकसित होताना आत्ता अनेक आव्हाने कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहेत.


कोकणातील हापूस आंब्याची वितरण व्यवस्था आणि व्यापार पारंपरिकच राहिला. येथील शेतकरी कायम व्यापाऱ्यांवर अवलंबून राहिला ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षे, डाळिंब व खान्देशामधली केळी यांच्या मार्केटिंगचे नियोजन तेथील शेतकऱ्यांनी आणि सरकारने केले. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, सीताफळ जगभर शेतातूनच निर्यात होऊ लागले आणि या फळांच्या शेतीतून शेतकऱ्यांकडे समृद्धी आली. दुर्दैवाने कोकणात असे घडले नाही. कोकणातील शेतकरी कायम व्यापाऱ्यांवर अवलंबून राहिले. आणि दलाल आधारित मार्केटिंग व्यवस्थेमध्ये सर्वांत कमी वाटा वर्षभर प्रचंड परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि मोठा वाटा मधल्या वितरण व्यवस्थेला अशी स्थिती झाली. सुरुवातीला हापूस आंब्याचे पेटीचा भाव भरपूर द्यायचा आणि एप्रिल-मे महिन्यांत मुख्य पीक आल्यानंतर भाव पाडायचे. अगदी हजार, सातशे, पाचशे, चारशे असे पेटीचे भाव आल्यानंतर वर्षाच्या शेवटी शेतकरी आपल्या पेटीला भाव काय मिळाला त्याची सरासरी काढायचा तेव्हा त्याला पाचशे, सातशे, आठशे रुपये मिळालेली असायची. म्हणजेच हापूस आंब्याचे उत्पादन करण्यासाठी खते, फवारण्या, कामगार, लाकडी पेट्या, पॅकिंगचा खर्च हा पेट इ. मागे हजार-बाराशे आणि आंबे विकल्यानंतर प्रत्यक्ष मिळाले, सातशे-आठशे, म्हणजेच प्रचंड परिश्रम करून अनेकदा शेतकऱ्याला वर्षाच्या शेवटी नुकसान झाले आणि कर्ज वाढले.

अशी स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये होत गेली. यातून कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत गेल्या. संपूर्ण जगाचे आवडते फळ असतानादेखील कोकणातील शेतकरी हापूस आंब्याच्या शेतीतून हळूहळू श्रीमंत होण्याऐवजी कर्जबाजारी होऊ लागला. कोकणातील स्वाभिमानी शेतकरी सरकारकडे कधीच कर्जमाफी, नुकसानभरपाई मागत नाही आणि सरकारी यंत्रणा त्याला कधी मदत करत नाहीत. स्वयंपूर्ण पद्धतीने वर्षानुवर्षे कोकणातील आंबा बागायतदार काम करीत आहे. मात्र, देशाचा समृद्ध वारसा असलेला हापूस आंबा आणि हा आंबा निर्माण करणारा कोकणातील शेतकरी आणि हापूस आंब्याची शेती याचे दीर्घकालीन नियोजन करून जगाला भुरळ घालणारा हापूस आंबा पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात कसा येईल आणि शेत पिकवणारा कोकणातील स्वाभिमानी शेतकरी आर्थिक समृद्ध जीवन कसे जगू शकेल याचे प्रदीर्घ नियोजन केले पाहिजे.

या विषयात काम करणाऱ्या वेगवेगळ्या आंबा बागायतदार संघटना आणि तज्ज्ञांबरोबर विचारविनिमय करून याचा एक ॲक्शन प्लॅन आम्ही बनवला आहे आणि गेली तीन-चार वर्ष यावर सातत्याने काम करत आहोत. अलीकडे कोकणातील हापूस आंब्याला आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाला एक मोठा धोका निर्माण झाला आहे. हापूस आंब्याला सर्वाधिक भाव मिळतो म्हणून कोकणातून हापूस आंब्याची करोडो कलमे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नेण्यात आली. अगदी आफ्रिकेमध्येसुद्धा हापूस आंब्याची लागवड करण्यात आली. सुदैवाने पातळ साल आंबट गोड संपूर्ण जगाला भुरळ घालणारी हापूस आंब्याची चव, त्याचा रंग आणि त्याचा सुगंध ही परमेश्वराने कोकण प्रदेशाला दिलेली देणगी आहे. इथला लाल जांभा दगड, आणि खारी हवा आणि आदर्श हवामान अन्य कुठेच नसल्यामुळे या दर्जाचा हापूस आंबा कोकणाव्यतिरिक्त आणि विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य कुठेही या दर्जाचा आंबा पिकत नाही. कोकणाबाहेरील आंबा जाड सालीचा, तुरट आणि आंबट बनतो. परंतु मागच्या आठ-दहा वर्षांत मुंबईच्या बाजारपेठेमध्ये कोकणातल्या हापूस आंब्याबरोबरच कोकणाबाहेरील हापूस आंब्यासारखे दिसणारे आंबे शेकडो टनांनी येतात. या आंब्यांचा उत्पादन खर्च कमी, काढणी आणि पॅकेजिंगचा खर्च खूप कमी यामुळे हे आंबे कोकणातील आंब्याच्या तीन पट कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. दुर्दैवाने अतिव्यापारीकरणामुळे अनेक जण हे आंबे देवगड आणि रत्नागिरीच्या बॉक्स मध्ये टाकून कोकणातील हापूस आंबे म्हणून विकतात. यात हापूस आंब्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होते. हे स्वस्त आंबे असल्यामुळे कमी किमतीत विकले जातात. यामुळे हापूस आंब्याचा बाजार पडतो व कोकणातील हापूस आंबासुद्धा कमी किमतीमध्ये विकावा लागतो. हापूस आंब्यामध्ये होणाऱ्या भेसळीचा परिणाम कोकणातील हापूस आंबा बागायतदार शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळण्यामध्ये झाले आहे. यातून कोकणातले शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.या सर्व विषयावर सातत्याने चिंतन करून मी स्वतः पुढाकार घेतला. कोकण कृषी विद्यापीठ व कोकणातील आंबा बागायतदार संघटना कोकणातील आंब्याला विशेष दर्जा मिळावा व 'जीआय' मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मी स्वतः देशाचा उद्योगमंत्री या नात्याने हापूस आंब्याला 'जीआय' मानांकन मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला व प्रत्यक्ष जीआय मानांकन मिळवून घेतले. 

आत्ता कोकणातला हापूस आंबा कायद्याने सुरक्षित झाला. यापुढे फक्त कोकणातील हापूस आंब्याला हापूस म्हणता येईल अशा स्वरूपाची तरतूद झाली. याशिवाय हापूस आंबा कोकणातून थेट जगभर निर्यात करता यावा याकरता विमान वाहतूक मंत्री या नात्याने हापूस आंब्याच्या निर्यातीची व्यवस्था गोवा या राज्यातून केली. कोकणातून थेट दिल्ली आणि देशाच्या प्रमुख शहरांमध्ये हापूस आंब्याची वाहतूक व्हावी म्हणून रेल्वेमंत्री या नात्याने कोकण रेल्वेच्या माध्यमातून देशभर आंब्याच्या वाहतुकीची व्यवस्था रेल्वेने केली आणि त्याकरता आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या विषयातील देशातील सर्व प्रमुख संस्था आणि त्यांचे प्रमुखांना रत्नागिरी येथे बोलावून हापूस आंब्याकरिता कोकणात कोणत्या पायाभूत सुविधा हव्यात त्याचे नियोजन केले आणि याकरिता एक मोठे पॅक हाऊस कोंकोरच्या माध्यमातून देवगड येथे बनवले. 

कोकण रेल्वेच्या स्थानकांवर आणि गोवा विमानतळावर कोकणातील उत्पादनांना आणि हापूस आंब्याला तात्पुरती विक्री मिळावी याची व्यवस्था उभारली. कोल्हापूरचे विमानतळ सुसज्ज व्हावे आणि भविष्यात चिपी विमानतळावरूनसुद्धा कोकणातील हापूस आंबा जगभर जावा अशा स्वरूपाचे नियोजन आम्ही करीत आहोत.